हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज दिला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. पालघर, नाशिक तसंच बुलढाणा जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.
मुंबई : हवामान विभागाने राज्यात ७२ तासांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात काल रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पालघर, नाशिक तसंच बुलढाणा जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पाच ते आठ मार्च दरम्यान वीजेच्या कडकडांसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं मका, केळी आणि पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील पूर्व भागात आज पावसानं हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात वीजेच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झाले.
पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला. यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदारस वीट भट्टी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला.