अकलूज – महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे होते ,असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी शंकरराव मोहिते महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील हे होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,” सुमारे ९०० वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी पुरोगामी विचार बाळगून समता प्रस्थापित करण्यासाठी क्रांतिकारी अशा स्वरूपाचे कार्य केले. समाजातील स्त्रिया व शूद्र यांना सन्मानाची वागणूक देण्याची आग्रही भूमिका घेतली . सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून कार्य केले. त्यांचे वास्तव्य आपल्या सोलापूर जिल्ह्यातही दीर्घकाळ होते, ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.त्यांचे कार्य व्यापक स्वरूपात समाजासमोर यावे, यासाठी विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर अध्यासन स्थापन केले आहे.”
अध्यक्ष स्थानावरून बोलताना ,सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले की, “महात्मा बसवेश्वरांच्या महान कार्यावर आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय इतिहास परिषद होत आहे, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट आहे. महात्मा बसवेश्वरांचे कार्य सर्व समाजासमोर येणे आवश्यक आहे.
(*चौकट-कुलगुरूंनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरामध्ये वृक्षारोपणासाठी उपस्थितांना रोपे दान करण्याचे आवाहन केले. तो धागा पकडून, अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील यांनी, वृक्षारोपणासाठी एक हजार रोपे विद्यापीठाला देण्याचे जाहीर केले*)
यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक चंद्रकांत गार्डी, बीजभाषक गजानन धरणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक वसंतराव जाधव ,रामचंद्र गायकवाड, उत्कर्ष शेटे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य एडव्होकेट रणजीतसिंह माने देशमुख,अप्पासो मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
इतिहास विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय मगर यांनी या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजना मागची भूमिका विशद करून बीजभाषक प्राचार्य गजानन धरणे यांचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी महाविद्यालयामध्ये होत असलेल्या उपक्रमांचा व उल्लेखनीय बाबींचा आढावा घेऊन या परिषदेसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या सर्व संशोधक प्राध्यापकांना धन्यवाद दिले.
बीजभाषक प्राचार्य डॉ.गजानन धरणे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. या सत्राचे अध्यक्षस्थानी डॉ.चंद्रकांत चव्हाण हे होते.
या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक (कलबुर्गी) येथून आलेले विशेष अतिथी डॉ.बी.बी.पुजारी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कानडी भाषेत असणाऱ्या विविध वचनांवर व साहित्यावर विस्तृत विवेचन केले. व महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे जगभर अभ्यासले जात असून जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, असे सांगितले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर कोळेकर हे होते.
तिसऱ्या सत्रात दोन टप्प्यात विविध भागातून आलेल्या संशोधक प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. याचे अध्यक्षस्थान डॉ .शिवाजीराव वाघमोडे व डॉ.विष्णू वाघमारे यांनी भूषवले.
समारोपाच्या सत्रात पुण्याहून आलेले ज्येष्ठ अभ्यासक बी.एम.पाटील यांनी बसवेश्वरांच्या कार्यावरील परिषदेचा आढावा घेऊन, ‘जीवन जगत असताना अधिक गंभीर न होता खिलाडू वृत्तीने व हसत खेळत जगणे आवश्यक आहे’, असे सांगितले.
या परिषदेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ .चंद्रकांत चव्हाण, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. विष्णू वाघमारे. डॉ. शिवाजीराव वाघमोडे. डॉ राजेंद्र गायकवाड, आदींनी आपले विचार व्यक्त केले.
ही राष्ट्रीय इतिहास परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. विश्वनाथ आवड ,
डॉ.एच.के.आवताडे, डॉ.बाळासाहेब मुळीक व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा.डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले तर, विनायक प्रा. सूर्यवंशी व डॉ. संजय वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.





















