सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात योगदान देणाऱ्या हत्तूर येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने लिं. यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २६७ ऊसतोड कामगारांसाठी मोफत नोंदणी करण्यात आले . त्यामुळे या कामगारांना शासनाकडून विविध योजनांचे लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच २७३ जणांची त्यांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.
हत्तूर येथील राजेंद्र कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थ बँक, पतसंस्था,सहकारी संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.या शिबिराची सुरुवात समर्थ कुलकर्णी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर परिवाराचे प्रमुख राजेंद्र कुलकर्णी, सरपंच ज्योती कुलकर्णी, प्रा. सिद्राम म्हेत्रे, बम्मनिंगय्या स्वामी, भीमाशंकर कनपवडीयर, सिकंदर नदाफ, ज्योत्यप्पा सिनेवडीयर, बाबुराव नारायणे, बशीर शेख, सिद्धाराम कानडे, बनसिद्ध पटेवडियर, भीमाशंकर छप्पेकर, महादेव कांबळे, गनी शेख, शिवानंद हावडे पाटील, विठ्ठल हतूरे, प्रकाश निबंर्गी, वासु नाईकवाडे, शिवानंद निरवणे, भीमाशंकर कुलकर्णी, महातप्पा सिताफळे, आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्याने त्यांना शासनाकडून विविध योजनेचा लाभ मिळत नाही.या भागातील कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.या नाव नोंदणी मुळे कामगारांना गृहउपयोगी भांडी वस्तू मिळतील, दुदैवाने अपघातात मृत्यु झाल्यास ३५ लाख,कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख तसेच शेतातील बैलांच्या जोडीचा मृत्यु व अपंगत्व एक लाख तसेच झोपडीचे नुकसान झाल्यास दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.
























