जेऊर – पोमलवाडी (ता. करमाळा) येथील उजनी जलाशयाच्या काठावरील शेतातील घरात आयुष्याची संध्याकाळ शांतपणे व्यतीत करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा वादळाच्या तडाख्यात अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारा अंत झाला. जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) आणि शालन जगन्नाथ नवले (वय ७५) यांच्यावर रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घराची सिमेंट काँक्रीटच्या विटांची भिंत कोसळली आणि क्षणार्धात त्यांच्या संसाराचा दिवा कायमचा विझला.
रात्रभर ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.दूसर्या दिवशी सकाळी नातू अभिजित नवले करमाळा येथून आजोबा-आजींची भेट घेण्यासाठी पोमलवाडी येथे आला. मात्र, घराजवळ पोहोचताच त्याला समोर दिसलेले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. घराची भिंत कोसळलेली आणि सर्वत्र विटांचा ढिगारा पडलेला होता. अनर्थ घडल्याची जाणीव होताच त्याने जवळील उजनी काठावरील मच्छिमारांना मदतीसाठी बोलावले.
मच्छिमारांच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम सुरू झाले. विटा बाजूला काढल्यानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आजी-आजोबांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी शालन नवले यांच्या हातात जेवत असतानाचा घास तसाच असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जेवणासाठी बसलेल्या या वृद्ध दाम्पत्याला पुढच्याच क्षणी मृत्यूने गाठले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही मृत देह शवविच्छेदनासाठी करमाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध दाम्पत्याच्या अकाली आणि दुःखद निधनाने पोमलवाडी गाव शोकसागरात बुडाले आहे.
चौकट
“वाशिंबे,केतूर,पोमलवाडी,पारेवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे.पोमलवाडी येथे भिंत कोसळून वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
नागरीकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. वादळी परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडांखाली थांबू नये, विजेच्या खांबांपासून व तारा पासून दूर राहावे, तसेच धोकादायक व जीर्ण भिंतींपासूनही सावधगिरी बाळगावी
— *शिल्पा ठोकडे, तहसीलदार,
करमाळा
Post Views: 6