टेंभुर्णी – कन्हेरगाव (ता. माढा) येथील वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठा मागील दोन महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून टेंभुर्णी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन टेंभुर्णी येथील महावितरणचे उपअभियंता महेश पवार यांना देण्यात आले आहे. यावेळी कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे , संजय उर्फ दादासाहेब डोके पाटील , किशोर मोरे उपस्थित होते .
निवेदनात म्हटले आहे की, कन्हेरगाव येथील वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठा दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत खंडित ठेवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर परिणाम होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही या समस्येचे निराकरण करण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा तात्काळ नियमित करण्याची मागणी करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास १५ जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनाला परिसरातील ग्रामस्थांचा पाठिंबा असून, महावितरण प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Post Views: 35