अककलकोट – श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट येथे बेला फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छंद वर्ग समारोप तसेच चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.
श्री स्वामी समर्थ राजेराय मठातील पादुका स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच सद्गुरू बेलानाथ महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छंद वर्ग, चित्रकला स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपली कला, कल्पकता, बौद्धिक क्षमता व सर्जनशीलता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाचे अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे होते. व्यासपीठावर मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके , मठाचे सचिव डॉ. किसन झिपरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व मठाच्या विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत बेला फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. श्रद्धांक झिपरे यांनी केले.
यावेळी चित्रकला, बुद्धिबळ स्पर्धा व छंद वर्गामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, मेहनतीचे व यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मठाचे सचिव डॉ. किसन झिपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे, मेहनतीचे व स्पर्धेतील यशाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
छंद वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाटक व विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे समारंभाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली व सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सादरीकरणासाठी अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून परिश्रम घेतले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे, शिस्तबद्धतेचे व कलाविष्काराचे कौतुक करत त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे ओघवते व प्रभावी सूत्रसंचालन अतुल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुष्पा जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, सेवेकरी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेला फौंडेशनच्या नामीत झिपरे, धनंजय गायकवाड, पुष्पा जाधव, अमृता पोतदार, जनक झिपरे, रतिकांत पाटील, जयसिंग बर्वे, आनंद पाटील, अमरीश तसेच कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर श्री स्वामी समर्थ राजेराय मठातील सर्व सेवेकरी व विद्यार्थ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन होऊ शकले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, भक्तगण, सेवेकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.