पंढरपूर – आषाढी यात्रा केवळ पंधरा दिवसांवर येवून ठेपली आहे. तरी देखील केवळ बैठकांच्या फार्स शिवाय सरकारी बाबूंकडून कोणत्याची कामांची प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. पंढरपूरात पाहिले तर यात्रेच्या नियोजनाची कोणतीही तयारी इथे अजून दिसत नाही आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे असो की चंद्रभागेच्या वाळवंटातील ढिगारे उपासण्याचे काम असो सर्व परिस्थिती जैसे थी अशीच आहे. त्यामुळे जगतगुरु तुकोबारायांच्या अभंगातील संतवचना प्रमाणे मारीतसी बोंब, परी न ऐकती । उघडली दृष्टी,तरी न देखती ।। अशीच काहीशी अवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरात झालेली असून पंढरपूरकरांनी कितीही बोंब मारली तरी सरकारी अनास्था आहे तशीच राहणार…

राज्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा म्हणून आषाढी यात्रेचा आवर्जुन नामोल्लेख केला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अगोदरच कँलेंडर नवीन वर्षाचे कँलेंडर प्रसिध्द होत असते. त्या मध्ये आषाढी एकादशी किती तारखेला आहे हे ठळकपणे छापलेले असते. त्यामुळे आषाढी यात्रेची निगडीत विविध कामे अगोदरच एक, दोन महिने सुरु करणे अपेक्षीत असते. कारण पुरेसा वेळ मिळाला तर केलील जाणारी विविध विकास कामे ही दर्जेदारपणे होतात. मात्र तसे न करता आषाढी एकादशीच्या अगोदर दोन,चार दिवस यात्रेशी संबंधित असलेली शहरातील विविध विकास कामे घाईगडब़डीत उरकून विविध शासकीय विभागांचे आधिकारी ( ठेकेदारांशी असलेल्या अर्थपुर्ण मैत्रींमुळे ) कशीबशी यात्रा पार पाडीत असतात.
त्यामुळेच तमाम पंढरपूरकर नागरिकांकडून यात्रेसाठीच्या लाखों, कोट्यावधींच्या मंत्र्यांसंत्यांकडून केल्या जाणाऱ्या शासकीय निधीच्या घोषणेवर वारी वारकऱ्यांची नव्हे तर आधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांचीच असते असे उपरोधाने बोलतात. मात्र हे जरी शासकीय यंत्रणेला ठाऊक असले तरी याचे कोणतेच सोयरसुतक या निढार्वलेल्या सरकारी यंत्रणेला नसते याचि प्रचिती यावेळीही शहरात दिसून येते. कारण नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे येवून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रेच्या कामांच्या संदर्भात त्वरीत पाऊले उचलण्यास सांगितले.
कारण यात्रेच्या दृष्टीने शहरातील रस्ते, चंद्रभागा वाळवंटातील राडारुडा, कडेला पडलेले मातीचे ढिगारे उपसणे, पासष्ठ एकरची मलपट्टी, पालखी तळांवरील विविध कामे, तात्पुरच्या बसस्थानकांच्या परिसरातील जमीन सपाटीकरण, मुरुमीकरणांसारखी कामे, स्वच्छतागृहे,शौचालये, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारे जर्मन हँगरची कामे ही दर्जेदारपणे होणे अपेक्षीत असते. मात्र सरकारी अनस्थेपुढे हे सर्व झुठ आहे.
कारण शहरातील प्रमुख रस्त्यांची आजची परिस्थिती पाहिली तर खूपच भंयकर अशी झालेली दिसत आहे. कारण नगरप्रदक्षिणा सारख्या रस्त्यांची जर वाईट स्थिती असेल तर इतर रस्त्यांच्या बाबतीत विचार देखील न केलेला बरा. मात्र सरकारी बाबू एकादशीच्या अगोदर एका रात्रीतून शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे ( खऱ्या डांबराविना केवळ आँईलमिश्रीत डांबरसदृश्य तेल वापरुन) खडीचा मुलामा देवून बुजविण्यात तरबेज असतात. यात्रा काळात थोडाजरी पाऊस पडला तरी वारकरी भाविकांचे बेहाल होतात. मात्र गर्दीच्या काळात बिचारे वारकरी ( खरा वारकरी कितीही त्रास झाला तरी कोणतीही तक्रार करीत नसतो. तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी केवळ आसुसलेला असतो ) दाद मागणार किंवा तक्रार करणार तरी कुणाकडे.
राज्याचे मख्यमंत्री शासकीय महापुजेसाठी अगदी वेळात वेळ काढून येथे येत असतात. मुख्यमंत्री ज्या मार्गावरुन मंदिरात जाणार ( तेही मध्यरात्री गाडीतून जाणार) तेवढ्याच मार्गाची मलमपट्टी केली की शासकीय बाबूंचे काम झाले. पहाटे पुजे नंतर मुख्यमंत्र्यांचे येथून मुंबईच्या दिशेने हेलिकाँप्टर झेपावले की शासकीय आधिकाऱ्यांच्या दृष्टीने आषाढी यात्रा संपली असे समजून सुटकेचा निश्वास टाकला जातो. मग वारकरी काय आणि वारी काय अशी अवस्था एकंदरीतच पंढरपूरची होते. त्यामुळे पंढरपूरकरांनी कितीही बोंब मारली तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही असा एकंदर समज शासकीय यंत्रणांचा होवून बसलेला आहे.
त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच यात्रेशी संबंधित विविध खात्याचे किंवा विभागाचे मंत्री यांनी कोणताही गाजावाजा न करता येथे येवून यात्रेच्या अगोदर होत असलेल्या कामांची पाहणी करुन आधिकाऱ्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.
कारण कोट्यावधी रुपयांचा निधी केवळ अनाठायी खर्ची पाडून जर बिचाऱ्या वारकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणार नसेल तर शासनाच्या यात्रा नियोजनाचा काय उपयोग ? त्यामुळे हा सर्व अनागोंदी कारभार केवळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उघड्या डोळ्यांनी पाहून सरकारी अनस्थे विषयी फक्त आणि फक्त बोंब मारण्या पलिकडे समस्त पंढरपूरकरांच्या हातात कोणताच पर्याय उरणार नाही.
————————-
चौकट : ( एकनाथ शिंदेंनी सुरु केली नवीन परंपरा )
आषाढी यात्रेच्या अगोदर येवून शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या यात्रा नियोजन पाहण्याची तसदी यात्रेपूर्वी कोणतेही मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री घेत नव्हते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजे अगोदर पंढरपूरचा दौरा करुन येथील कामांची पाहणी केलेली होती. त्यावेळी त्यांनी दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट येथे वारकऱ्यांशी थेट संपर्क करुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. त्या संदर्भात वारकऱ्यां समोरच आधिकाऱ्यांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले होते. मागील वर्षी देखील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी येथे येवून कामांची पाहणी केलेली होती.
————————–
चौकट : ( मुख्यमंत्र्यांनी देखील अगोदर येवून पाहणी करावी )
एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय महापुजेच्या अगोदर येथे येवून अगदी वाखरी पासून ते चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, विविध मठ, धर्मशाळा, पासष्ठ एकर आदी ठिकाणां पर्यंत प्रत्यक्ष भेट देवून वारकऱ्यांशी संवाद साधून यात्रेच्या सर्व तयारीचा आढावा घ्यावा अशी मागणी पंढरपूरवासियांकडून केली जात आहे.
—————
Post Views: 10