सोलापूर : शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा ‘मित्रा’चे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २० जुलैपूर्वी अंतिम तांत्रिक प्रकल्प अहवाल (टीपीआर) शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून पुढील दोन ते अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अंतिम टीपीआर, जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. टीपीआर मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग देण्यात येणार आहे.
योजनेच्या निविदा प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असून, निविदा अंतिम झाल्यानंतर कामाला तातडीने सुरुवात केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्जाबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण, नवीन जलवाहिन्यांचे जाळे, जलसाठा केंद्रे आणि सक्षम वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सोलापूरकरांना दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सोलापूरकरांना पुरेसा पाणीपुरवठा
करणे हेच प्रमुख उद्दिष्ट : महापौर कोंड्याल
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “सोलापूरच्या भविष्यासाठी ही पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीणसिंह परदेशी यांच्या सहकार्यामुळे योजनेला गती मिळाली आहे. २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर शासनाकडे सादर करून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सोलापूरकरांना दीर्घकालीन आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
– प्रकल्पाची किंमत : १३७८ कोटी रुपये
– २० जुलैपूर्वी : अंतिम टीपीआर शासनाकडे सादर
– सप्टेंबर-ऑक्टोबर : निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन
– कालावधी : दोन ते अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
– निधी : जागतिक बँकेच्या प्रस्तावित कर्जाचा विचार
– फायदा : आधुनिक जलवाहिन्या, जलसाठा व्यवस्था आणि दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा.
Post Views: 32