अकलूज – पालकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नयेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पूढील शिक्षण घेऊ द्यावे. शिक्षण प्रसारक मंडळ गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी करावा असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
स्मृती भवन शंकरनगर येथे आयोजित केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता १०वी,१२वी व रत्नाई मार्गदर्शन केंद्रातील सीईटी परीक्षेतील एकूण १२४ गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार जयसिंह मोहिते पाटील व युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जयसिंह मोहिते पाटील बोलत होते. कार्यक्रमास सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, संचालक सुभाष दळवी, नारायण फुले, पांडुरंग एकतपुरे, वसंत जाधव, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. प्रस्ताविकात संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे म्हणाले, संस्थेच्या ५५ शाखेतून २५ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता संस्थेने अनेक मोठे उपक्रम राबवले आहेत. संयुक्त परीक्षा पद्धती मुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढली आहे. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
विद्यार्थिनी कु. सृष्टी दोशी म्हणाली, शिक्षण प्रसारक मंडळाने मला आत्मविश्वास दिला म्हणूनच मी हे यश संपादन करू शकले विद्यार्थ्यांनी सातत्याने कष्ट करावे.
इयत्ता १०वी परीक्षेत कु. सृष्टी दोशी हिने ९९.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम तर कु. संस्कृती कोरेकर ९७.४० टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला.कु.समृध्दी बाबर हिने ९७ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.
तर १२ वीत अरबाज बागवान याने ९३.८३ टक्के मिळवित संस्थेत प्रथम तर कु. अपूर्वा राऊत यांनी ९१.८३ टक्के मिळवित द्वितीय व कु. आफरीन मोकाशी हिने ९१.५० टक्के मिळवित तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख रकमेची बक्षीसेही देण्यात आली. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, आर आर पाटील यांनी केले.
Post Views: 8