पंढरपूर – दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी दिनांक १६ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्रींचा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार तात्पुरते बंद राहतील. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे सुरू राहतील. दिनांक ०३ ऑगस्ट (प्रक्षाळपूजा) पर्यंत भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यावेळी श्रींचा पलंग काढण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला. या प्रसंगी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, अँड माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर तसेच पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना जलद, सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. दर्शनरांगेत बॅरिकेटिंग व संरक्षक जाळी बसवून घुसखोरी रोखण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन व टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली असून, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा देखील बंद करण्यात आल्या आहे. दर्शनरांगेतील रहदारी सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच अनुभवी पर्यवेक्षक, कमांडोज व माजी सैनिकांची सुरक्षा व्यवस्थेत नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी, मंदिराचे व्हीआयपी प्रवेशद्वार बंद ठेवणे, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, लाईव्ह दर्शन व्यवस्था आणि दर्शनरांगेत भक्तिगीतांचे प्रसारण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, श्रींच्या नित्योपचारापूर्वी दर्शनरांग योग्य पद्धतीने नियंत्रित करून दर्शन बंद राहण्याचा कालावधी कमीतकमी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना शक्य तितक्या कमी वेळेत दर्शन मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
Post Views: 7