अक्कलकोट – संतभूमी देहू आणि आळंदी येथील नदीघाटांच्या धर्तीवर हन्नूर येथील हरणा नदीकाठी आकर्षक घाट उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.या कामासाठी शासनाकडून १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला असून,शनिवारी उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन व कामाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला.जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी आणि उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनीही या कामासाठी विशेष प्रयत्न केला होता.
हन्नूर येथील हरणा नदी धार्मिक,सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.याठिकाणी घाट उभारल्यानंतर नदीकाठ अधिक सुशोभित होणार असून धार्मिक कार्यक्रम, स्नान,पूजाविधी तसेच नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देहू-आळंदीप्रमाणे नदीकाठाचा विकास होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे,हरणा नदी ही अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागासाठी वरदान मानली जाते.या नदीच्या प्रवाहावर कुरनूर धरणाचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने या नदीचे पर्यावरणीय व विकासात्मक महत्त्व अधिक अधोरेखित होते.यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी,गिरमला पाटील, अनंदराव खांडेकर,अर्जुन जळकोटे,शरणप्पा हेगडे, अमोल हिपरगी,मलिकार्जुन स्वामी,श्रीशैल बिराजदार, नागनाथ जकिकोरे,गंगाधर हताळे,बसवराज पारतनाळे, नागनाथ रोट्टे,भरत टिकबंरे, शरणप्पा बंदिछोडे,सचिन जळकोटे आदी उपस्थित होते.





















