हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे.काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.देशाला यादवी युद्धाचा धोका आहे, हिंदूंनी जागे झाले पाहिजे ‘, असा इशारा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला.
देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,वाढलेले कर्ज,बेरोजगारी, प्रत्येक पावलावर देशाचा होणारा अपमान,अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रातील राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. या सभेत आनंद दवे यांनी सत्ताधारी भाजपाच्या निराशाजनक कामगिरीवर , धोरणांवर कडाडून टीका केली. न्यू इंग्लिश स्कुल(टिळक रस्ता,पुणे)च्या गणेश सभागृहात ही सभा झाली.हिंदू महासंघाची ही पहिलीच जाहीर सभा होती.हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन केले आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली.विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. भगवान कोकरे, मनोज तारे, विवेक परदेशी , राहुल आवटी, मनोज जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भगवान महाराज कोकरे म्हणाले, ‘ध्येयाने एकत्र आलेले प्रत्येक वेळी हरले नाहीत, आणि खूप संख्येने एकत्र आलेले प्रत्येक वेळी जिंकले नाहीत. गोहत्याबंदी आहे तर हिंदुत्ववादी पक्षाच्या राज्यात सर्व देशात गोहत्याबंदी कायदा का होत नाही ? गोमांस निर्यात का केले जाते ? असा प्रश्नही कोकरे यांनी विचारला. आपले नाव देश पेटविणाऱ्यांच्या यादीत नसावे, तर राष्ट्र उभारणीच्या कामात असावे, असेही त्यांनी सांगीतले.
आनंद दवे म्हणाले, ‘मतदान कोणालाही केले तरी सरकार एकाच पक्षाचे येते अशी परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाही. हिंदूंवर अन्याय होत आहे.२०१४ नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. देशाला, धर्माला मसिहा वाटणारे मोदी आज तसे वाटत नाहीत. महागाई,भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम झाला नाही. संसदेत हसणं खिदळणं चाललं आहे. नवी लक्झरी विमाने स्वतःसाठी घेतली गेली. दरवर्षी दोन कोटी प्रमाणे २० कोटी नोकऱ्या मिळाल्या का ? रिझर्व बँकेच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. हिंदूंना गरीब आणि बेरोजगार कोण करत आहे ?असा प्रश्न दवे यांनी विचारला. किती दिवस नेहरूंची बदनामी करत जगायचे, स्वतःचे कर्तत्व दाखवले पाहिजे.
‘हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे.जी -२० परिषदेच्या निमित्ताने गरीबी झाकण्याचे काम केले जात आहे. अदानीसारख्या उद्योजकाच्या रूपाने देशाचा पैसा बाहेर जात आहे. ६७ योजना जाहीर झाल्या पण अयशस्वी झाल्या.एलआयसी विकली जात आहे . मग तुम्ही सत्तेत असून करताय तरी काय ? काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.पूलवामाचे आरोप का सापडले नाही. मग हे सत्तेवर कसे राहू शकतात. मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.मुलायमसिंग यांना पद्म पुरस्कार मिळाला पण, सावरकरांना भारतरत्न या सरकारला देता आले नाही’, अशी टीकाही दवे यांनी केली.