कल्याण – शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर समाविष्ट केलेल्या ४४ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना क्रीडा गुण देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप क्रीडा संघटनांनी केला आहे. या प्रलंबित निर्णयामुळे राज्यातील लाखो खेळाडूंचे शैक्षणिक व क्रीडा भवितव्य टांगणीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील ४४ क्रीडा संघटनांनी एकत्र येत क्रीडा अधिकारी कार्यालयांसमोर ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

’शालेय खेळ-क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेने याबाबत अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, येत्या १० दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन आणि त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना सादर केले आहे.
१३ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
सन २०१३ मध्ये तत्कालीन क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि क्रीडा आयुक्तांच्या मान्यतेने ४४ क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विनाअनुदान व विनागुणांकन प्रायोगिक तत्त्वावर स्थान देण्यात आले होते. भविष्यात या खेळाडूंना क्रीडा गुणांकन व इतर सवलती देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या १३ वर्षांपासून सर्व क्रीडा संघटना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आहेत. मात्र, अद्यापही या खेळाडूंना गुणांचा लाभ मिळालेला नाही.
आदेशानंतरही अंमलबजावणी शून्य!
या ४४ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना गुण व सवलती मिळाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री (स्व.)अजितदादा पवार, माजी क्रीडामंत्री सुनील केदार, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे, तसेच विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनीही वेळोवेळी शिफारस केली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात तत्कालीन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना गुणांकन देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
या प्रलंबित निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल ४ लाख खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे. पुढील १० दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथील मुख्य कार्यालयासमोर खेळाडू व पालकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले व सचिव शिवाजी साळुंखे यांनी दिला आहे.
——
न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही
“गेली अनेक वर्षे आम्ही राज्यातील लाखो खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत म्हणून पाठपुरावा करत आहोत. मात्र, शासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. क्रीडामंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदने देऊन चर्चा झाली, तरीही ठोस निर्णय झालेला नाही, हे दुर्दैवी आहे. यावर्षी खेळाडूंना गुण मिळाले नाहीत, तर संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”
— शाम राजाराम भोसले
अध्यक्ष, शालेय खेळ आणि क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य
“राज्य शासनाने शालेय स्पर्धांमध्ये नवीन खेळांचा समावेश करून क्रीडा संस्कृतीला नक्कीच चालना दिली आहे. परंतु, या खेळाडूंना क्रीडा गुण, सवलती आणि आवश्यक सुविधा मिळाल्या तरच खेळाडू खऱ्या अर्थाने प्रवाहात टिकून राहतील. शासनाने राज्यातील या ४४ क्रीडा संघटनांच्या शालेय गुणांचा प्रश्न तातडीने सोडून खेळाडूंवरील अन्याय दूर करावा.”
— तुकाराम ठोंबरे, अध्यक्ष, म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन.






















