सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला. यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले.
या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
दिवसभर सोलापूर शहर मध्य विधानसभा, उत्तर विधानसभा, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे विचार जाणून घेतले. अध्यक्ष पदांसाठी इच्छुकांनी अर्ज भरून निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सर्व अर्ज आणि चर्चेचा सविस्तर अहवाल काँग्रेस कमिटी कडे पाठवण्यात येणार असून, त्यावरून अंतिम निवडी केल्या जातील.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, रियाज हुंडेकरी, सुनील रसाळे, सुदीप चाकोते, भीमाशंकर जमादार, बाळासाहेब शेळके, बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोळू, सुभाष चव्हाण, अंबादास गुत्तीकोंडा, गणेश डोंगरे, उदयशंकर चाकोते, देवा गायकवाड, भारत जाधव, बाबुराव म्हेत्रे, नागनाथ कदम, राजन कामत, वाहिद बिजापूरे, महेश लोंढे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, शफी हुंडेकरी, भोजराज पवार, विश्वनाथ साबळे, नागेश म्याकल, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, लक्ष्मण भोसले, भारती इप्पलपल्ली, शुभांगी लिंगराज, करीमुनिसा बागवान, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, मुमताज तांबोळी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, रुस्तुम कंपली, सिद्राम सलवदे, लखन गायकवाड, आयाज आळंद, दिनेश म्हेत्रे, कोमोरो सय्यद, नूर अहमद नालवार, सागर उबाळे, रमेश हसापुरे, सचिन पवार, सचिन गुंड, सुदर्शन अवताडे, चंद्रकांत टिक्के, मोतीराम चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्ष कोण होणार हे येथील कार्यकर्तेच ठरवणार : पटनायक
पूर्वी पदाधिकारी निवडीसाठी नेत्यांच्या शिफारसीला महत्त्व दिले जात होते, मात्र आता संघटन सृजन अभियानामुळे ही पद्धत बदलली असून, सर्वांचे मत जाणून घेऊन, इच्छुकांचे अर्ज स्वीकारून आणि सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. “अध्यक्ष कोण होणार, हे येथील कार्यकर्तेच ठरवणार,” असे निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी : मोहन जोशी
प्रदेश निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले की, ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त, समर्पण आणि जनहिताप्रती असलेली बांधिलकी हीच संघटनेची खरी ताकद असून, याच सकारात्मक ऊर्जेच्या बळावर भविष्यातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी निवड प्रक्रिया कार्यकर्त्यांच्या सहभागातून पार पडणार आहे असून इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

















