बार्शी – तब्बल १३ वर्षे प्रलंबित असलेल्या अपघातातील मृत्यू प्रकरणात बार्शी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यांनी आरोपी ट्रॅक्टर चालक कल्याण गोरख पाडुळे (रा. घाणेगाव, ता. बार्शी) यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. हा निकाल न्यायमूर्ती श्रीमती पी. व्ही. राऊत मॅडम यांनी दिला.
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०४(अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), कलम २८३ (सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे), कलम ४२७ (मालमत्तेचे नुकसान) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, ९ एप्रिल २०१२ रोजी जामगाव (ता. बार्शी) येथील तुळजापूर-बार्शी मार्गावर आरोपीने उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. त्यावेळी मोटारसायकलस्वार नानासाहेब वसंत कुलकर्णी यांनी ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालय व त्यानंतर सोलापूर येथील गंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना १२ एप्रिल २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. मात्र, न्यायालयाने नमूद केले की, बहुतांश साक्षीदार प्रत्यक्षदर्शी नसून त्यांनी ऐकीव माहितीवर साक्ष दिली. घटनास्थळ पंचनामा करणारा पंच साक्षीदारही सरकार पक्षाला साथ देऊ शकला नाही. अपघातानंतर जवळपास १२ दिवसांनी घटनास्थळ पंचनामा करण्यात आल्याने त्याच्या विश्वासार्हतेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच, आरोपी अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होता, ट्रॉली त्यानेच अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे उभी केली होती किंवा अपघाताला तोच कारणीभूत होता, हे संशयाच्या पलीकडे सिद्ध करणारा ठोस पुरावा सरकार पक्ष सादर करु शकला नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.
या कारणांमुळे न्यायालयाने आरोपी कल्याण गोरख पाडुळे यांची भारतीय दंड विधान कलम ३०४(अ), २८३, ४२७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अंतर्गतच्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. तसेच त्यांचे जामीन बंधपत्र रद्द करुन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३७-अ अन्वये ₹१५ हजारांचे बंधपत्र घेण्याचा आदेश दिला.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. महेश जगताप, ॲड. राहुल कसबे, ॲड. केदार पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. आर. बी. काजळे यांनी कामकाज पाहिले.