टेंभुर्णी – मौर्य क्रांती संघ, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ तसेच राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून माढा लोकसभा मतदारसंघातूनही असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे मा. महेंद्र सोनवणे यांनी दिली.
या भव्य सभेचे उद्घाटक म्हणून मा. अविनाश शिंदे (राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या वडिलांचे वंशज) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये इतिहास संशोधक मा. हरीभाऊ कोळेकर, मा. नवनाथ कसपटे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रतापदादा पाटील, मा. चंद्रशेन लाहाडे, मा. बन्सीलाल भागवत तसेच मा. तुळशीराम सुभेदार यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब राहणार आहेत. राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या कार्याचा जागर, बहुजन समाजातील सामाजिक ऐक्य, इतिहास संवर्धन आणि मूलनिवासी समाजाच्या प्रश्नांवर या राज्यस्तरीय सभेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राजमाता अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायव्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
दि. ३१ मे २०२६ रोजी चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय अभिवादन सभेस बहुजन, मूलनिवासी, महिला, युवक व घुमंतू समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 12