बार्शी – आयएएस रमेश घोलप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवले. प्रशासकीय सेवाकाळात दुर्गम भागात पोहचून वंचितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. त्यामुळेच रमेश घोलप यांच्यासारखी समाजाची चिंता, काळजी वाहणारी माणसं समाजाला भारी वाटतात. त्यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकांतून युवकांना संघर्षातून ही ध्येय गाठण्याची व समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
आयएएस रमेश घोलप लिखीत ‘इथे थांबणे नाही’ या जीवन प्रवासाच्या सुधारित आवृत्तीचा तसेच घोलप यांचा संघर्ष, सेवा आणि जाणिवांचा प्रवास यांचे प्रतिबिंब असणाऱ्या उमेद प्रतिष्ठान निर्मित ‘वाट रेखाटणारी पावलं (ग्राऊंडेड ग्लोरी) या मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
मंजुळे पुढे म्हणाले, जगात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यातून आपल्या क्षमतेनुसार ध्येय ठरवून क्षेत्र निवडले पाहिजे. जे आवडते तेच करा. इतरांची कॉपी करु नका. व्यवसाय छोटा असो की मोठा त्यातूनही यशस्वी होता येते फक्त जिद्द हवी असे सांगितले.
आमदार दिलीप सोपल म्हणाले, कुठेच थांबायचं नाही हे मनातून असावं लागतं. घोलप यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांना यश मिळाले. झारखंडसारख्या राज्यात त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली, असे गौरवोद्गार काढले. राज्यातील भोंदूबाबाच्या प्रकरणाचा संदर्भ देत सोपल यांनी ज्ञानोबा, तुकोबांच्या महाराष्ट्रात लोकांमध्ये असुरक्षिततेची, अस्वस्थतेची भावना का वाढतेय? यावर एखाद्या चित्रपट काढा, अशी सूचनावजा विनंती मंजुळे यांना केली.
बीव्हीजीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड म्हणाले, जग सध्या पैशाच्या मागे धावत आहे. पण इतिहासाने पैशाच्या मागे धावणाऱ्या नव्हे तर प्रभावशील व्यक्तिमत्वांची दखल घेतली आहे. रमेश घोलप हा संवेदना, माणुसकी जपणारा माणूस आहे. त्यांनी लोकांच्या वेदना समजून घेत काम केले. युवकांना उद्देशून ते म्हणाले, जे करायचे ते सर्वाेत्तम करा. इथे थांबायचे नाही पण जायचं कुठं हे ही ठरवा. ते गाठल्याशिवाय थांबायचं नाही याचा ध्यास घ्या.
सत्काराला उत्तर देताना आयएएस रमेश घोलप म्हणाले, संकटांना नकारात्मकतेने पाहू नका तर संधी माना. परिस्थिती हलाखीची असेल तर समजून जा की तुमचा जन्म रेकॉर्ड तोडण्यासाठी झाला आहे. गुणवत्ता व कष्ट करण्याची तयारी असेल तर हलाखीची परिस्थिती आडवी येत नाही हे त्यांनी ठासून सांगितले. दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाने आयुष्याचे सर्कल पूर्ण झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रकाशक मनोज अंबिके यांनी दर्जेदार पुस्तक निर्मीतीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तहसीलदार धीरज मांजरे यांनी दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून चांगला आदर्श युवकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ.बी.वाय.यादव म्हणाले, जन्मभूमीशी नाते ठेवणारी व्यक्ती म्हणून आम्ही घोलप यांच्याकडे पाहतो, अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविकात उमेश घोलप यांनी उमेद प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी विचारपीठावर सभापती विजय गरड, प्रा. तानाजी ठोंबरे, राजा माने, विमल घोलप, रुपाली घोलप, नंदकुमार जगदाळे, पी टी पाटील, प्राचार्य डॉ दीपक गुंड, बीडीओ अमोल ताकभाते, शिवदास नलावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी केले. उमेद प्रतिष्ठानचे दिनेश घोलप, निलेश झालटे, मयूर गलांडे, खंडू डोईफोडे, बाळासाहेब ढेंबरे आदींनी परिश्रम घेतले.















