अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळाचे अध्यक्ष राजाराम आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २१ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मलिकनाथ) अखंड रथ पालखी,पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारी सुरू आहे. वारीदरम्यान टाकळी (विंचूर) (ता. निफाड) येथील मुस्लिम कुटुंबीयांकडून न चुकता दरवर्षी अखंड रथ पालखी व पायी दिंडीचे भावपूर्ण उत्साहात स्वागत करण्यात येते. एवढेच नव्हे तर या पायी दिंडीचा मुक्कामच या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी असतो. यावेळी शेख कुटुंबीयांकडून दिंडीतील वारकऱ्यांच्या मुक्कामासह सर्वांसाठी रात्रीचे भोजन व सकाळी चहा नाश्त्याची सोय करण्यात येते.
निफाड तालुक्यातील टाकळी (विंचूर) गावातील शेतकरी कुटुंबातील नजीर अहेमद शेख,फातेमा नजीर शेख हे दाम्पत्य मागील १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मनापासून सेवा करत असतात. या धार्मिक कार्यात त्यांना त्यांचा मुलगा राजमहंमद नजीर शेख,सून यास्मिन राजमहंमद शेख, नातू वसीम राजमहंमद शेख, नातसून मुस्कान वसीम शेख यांचीही साथ मिळत असते. पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था हे कुटुंबीय स्वतः करतात.
या वेळी सुध्दा सुमारे २०० वारकऱ्यांना शेख कुटुंबीयांनी बाजरीची भाकरी, पोळी, पातवड्याची काळ्या मसाल्यातील भाजी, भात आणि गोड शिऱ्याचे भोजन देऊन तृप्त केले. तसेच सकाळचा चहा-नाश्ता जिगर खान यांच्याकडून देण्यात आला. या पायी दिंडीत यंदा ५८ पुरुष, ३० महिला तर, १३ बालगोपाळांसह १०१ वारकरी सहभागी झाले आहेत.
टाकळी विंचूर येथील राजमहंमद शेख हे गरीब शेतकरी कुटुंब मुस्लिम असेल तरी गेल्या १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून सामाजिक एकोपा ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. पायी दिंडीत कोणत्या देवाला भजतात,याचा विचार न करता माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ मानून मुस्लिम शेख कुटुंबीय वारकऱ्यांची सेवा करतात ही अभिनंदनीय बाब आहे.