वेळापूर – आषाढी वारीतील पालखी सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असून या काळात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये तसेच आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वेळापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहनिकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा कक्षातील वैभव आहाळे वा अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व उपस्थित अधिकारी वर्गाचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. तसेच रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे उपसरपंच नानासाहेब मुंगुस्कर, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे, विजय बनसोडे, शंकर आडत , प्रियंका आडत, सीमा खाडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान वेळापूर सरपंच रजनिश बनसोडे यांनी सांगितले की माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर व पंचायत समिती सदस्या सौ विमलताई जानकर, जि प सदस्या सौ मीनाक्षी मिलिंद सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे वेळापूर ग्रामपंचायत उत्तम असे नियोजन करण्यात येणार व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काळामध्ये वेळापूर ग्रामपंचायत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी रजनीश बनसोडे यांनी दिली त्याचबरोबर सीईओ कुशल जैन यांनी पालखी तळावर मोठे मंडप कोठे उभारले जातात, वारकऱ्यांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याची सविस्तर माहिती घेतली. तसेच आगामी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी काय नवीन उपाययोजना करता येतील, याबाबतही त्यांनी सरपंच रजनीश बनसोडे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी सरपंच रजनिश बनसोडे यांनी पालखी सोहळ्याच्या काळात वेळापूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती दिली. तसेच वारकर्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळापूर पंढरपूर रोडवरील मदनसिंह माने देशमुख यांच्या हॉटेलजवळील नीरा कालवा फाटा रोड ते सांगोला रोडपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. हा रस्ता तयार झाल्यास पाण्याचे टँकर व इतर वाहतूक बाहेरून वळवता येईल आणि शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी शौचालये, स्नानगृहे व इतर मूलभूत सुविधा याबाबतची सविस्तर माहितीही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. सीईओ कुशल जैन यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत ग्रामपंचायत तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन केले.


























