सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर दौऱ्याच्या आठवणी आजही शहराच्या मनात जिवंत आहेत. त्या केवळ इतिहासाच्या पानांत नाहीत, तर फॉरेस्ट परिसरातील ‘गंगा निवास’ या सुंदर घरात आजही श्वास घेत आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या शेवटच्या सोलापूर भेटीला यंदा ८० वर्षे पूर्ण होत असताना, या वास्तूमधील प्रत्येक कोपरा त्यांच्या सहवासाच्या स्मृतींनी भारलेला दिसतो. जिथे प्रत्येक भिंत एक कथा सांगते आणि प्रत्येक कोपरा अभिमानाने भरलेला आहे.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर शहर – जिल्ह्यात अनेक वेळा आले. त्यांच्या पदस्पर्शाने ही नगरी क्रांतीप्रवण झाली. १४ जानेवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब ‘मद्रास मेल’ने सोलापुरात आले. त्यावेळी
हणमंतु सायण्णा पसलेलू (गार्ड) यांनी आपल्या घराचे दरवाजे केवळ पाहुणचारासाठी नव्हे, तर इतिहास घडवण्यासाठी उघडले होते. ‘गंगा निवास’मध्ये डॉ. बाबासाहेबांचा मुक्काम घडला आणि हे घर एका चळवळीचा साक्षीदार बनले. १९४० साली बांधण्यात आली. इमारतीची देखणी रचना, सुसज्ज आतील सजावट आणि हॉलमधील आकर्षक टाईल्स आहेत. आतील फर्निचर कर्नाटकी कलाकुसरीचे असून सागवानी लाकडाचे आहे. त्या काळात गंगा निवाससारखी भव्य वास्तू परिसरात नव्हती. डॉ. बाबासाहेबांना आणण्यासाठी त्यांनी खास हिलमन कार आणली गेली. तो प्रवास केवळ एका नेत्याचा नव्हता, तर समाज परिवर्तनाच्या विचारांचा होता.
या दौऱ्यात त्यादिवशी समता सैनिक दलाच्या जवानांनी स्वागत केले. त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सावरकर मंडळाच्या तिळगूळ समारंभात त्यांनी प्रभावी भाषण करत समाजप्रबोधन केले. तसेच रॅडिकल पार्टीच्या बैठकीत सहभाग नोंदवून स्थानिक राजकीय घडामोडींना दिशा दिली. सरकारी वकील अॅड. जी. आर. देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वनही व्यक्त केले. हरिभाई देवकरण शाळेतील मुळे सभागृहात जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिका यांच्या वतीने बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. बी. सी. होस्टेल येथे दलित विद्यार्थी फेडरेशनच्या सभेत त्यांनी सोलापूरकरांना मार्गदर्शन केले. या वेळी दादासाहेब गायकवाड व पा. ना. राजभोज यांची उपस्थिती होती. सभेत त्यांनी जीवप्पा ऐदाळे यांना असेंबलीच्या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले होते.त्या काळात जीवप्पा सुभाना ऐदाळे हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे आमदारकीचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरात आले होते.
गंगा निवास : वस्तूंमध्ये जपलेला स्पर्श
आजही गंगा निवासमध्ये एक ताट, एक ग्लास, एक तांब्या खुर्ची… साध्या वाटणाऱ्या या वस्तूंमध्ये इतिहासाचा स्पर्श जपला गेला आहे. डॉ. बाबासाहेबांनी वापरलेले हे दैनंदिन साहित्य केवळ वस्तू नाहीत, तर त्या क्षणांचे साक्षीदार आहेत, जेव्हा या घरात विचारांचा दिवा पेटला होता. गार्ड कुटुंबीय आजही त्या आठवणींना तितक्याच जिव्हाळ्याने जपतात. हणमंतू गार्ड यांचे नातू प्रकाश पसलेलू हे आजही याच घरात राहतात. जिथे प्रत्येक भिंत एक कथा सांगते आणि प्रत्येक कोपरा अभिमानाने भरलेला आहे.
जुनी होत चाललेली वास्तू ,
जिवंत राहिलेला इतिहास
काळाच्या ओघात गंगा निवासची इमारत जुनी झाली आहे पण आठवणी मात्र अजूनही ताज्याच आहेत.
ही केवळ एक वास्तू नाही तर हा आंबेडकरी चळवळीचा जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठेव्याचे जतन करणे ही केवळ गार्ड कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण गंगा निवास वाचला, तर इतिहास जिवंत राहील. इतिहास जिवंत राहिला, तर प्रेरणा कायम राहणार आहे.
‘गंगा निवास’ इतिहास जपणारी वास्तू
– ठिकाण : फॉरेस्ट परिसर, सोलापूर शहर.
– डॉ.बाबासाहेबांची भेट : १४ जानेवारी १९४६
– आगमन : ‘मद्रास मेल’ने सोलापुरात प्रवेश
– मुक्काम : हणमंतू सायण्णा गार्ड यांचे ‘गंगा निवास’
– प्रवास : हिलमन कंपनीची कार
– जतन केलेल्या वस्तू : ताट, तांब्या, ग्लास,
कप, फुलपात्र, डायनिंग टेबल.
– सोलापुरात प्रमुख कार्यक्रम : सावरकर मंडळ तिळगूळ समारंभातील भाषण, रॅडिकल पार्टी बैठक, हरिभाई देवकरण शाळेत मानपत्र स्वीकार, बी.सी. होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
– सद्यस्थिती : वास्तू जुनी असून संवर्धनाची तातडीची गरज

























