सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलाव प्रकल्पात उजनी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी इंगळगी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी, शिरवळ, कणबस, आलेगाव तसेच अक्कलकोट तालुक्यातील जेऊर आणि हंजगी या गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलाव प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. गतवर्षी उजनी धरणातील पाणी या तलावात सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या उजनी धरण जलद गतीने भरत असून, परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी धुबधुबी तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली.यासंदर्भातील निवेदन आमदार सुभाष देशमुख यांना देण्यात आले. यावेळी इंगळगीचे माजी सरपंच इनोदगी कोटे, संभाजी माने, चंद्रकांत गुरव, बाबूलाल शेरीकर, शिवानंद हत्तुरे, राहुल वंजारे, सागर धुळवे, रेवण सनके आदी उपस्थित होते.
चौकट
धुबधुबी तलावात कायमस्वरूपी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू : आमदार सुभाष देशमुख
निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलाव प्रकल्पात उजनीचे पाणी कायमस्वरूपी सोडण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून, त्यांच्यासमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच उजनी प्रकल्पाच्या अभियंत्यांशीही पत्रव्यवहार करून चर्चा करण्यात आली आहे. यंदाही धुबधुबी तलाव भरून देण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ :
सोलापूर : इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात उजनीचे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन आमदार सुभाष देशमुख यांना देताना इंगळगीचे माजी सरपंच इनोदगी कोटे, संभाजी माने, चंद्रकांत गुरव, बाबूलाल शेरीकर, शिवानंद हत्तुरे, राहुल वंजारे, सागर धुळवे, रेवण सनके आदी.
Post Views: 19