सोलापूर : पोलिसात दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून रविवारी सकाळी सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५ वर्ष, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी , भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून व दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सहाच्या सहा आरोपींना आज सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा आण्णा रेडडी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेडडी(सर्व आरोपी रा. कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी, सोलापूर ) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
वरील आरोपींनी वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून सुरेश कृष्णा श्रीराम याचा रविवारी सकाळी माधवनगर येथील नीलम बेकरी हॉटेल समोर भर रस्त्यावर तीष्ण हत्यारांनी सपासप वार करून व डोक्यात दगड घालून खुलेआम खून केला . आणि दुचाकीवरून फरार झाले होते . दरम्यान याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती .त्यानंतर या सर्व आरोपींना येथील न्यायालयात आज सोमवारी दुपारी हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली .
याबाबत मयत सुरेश ची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम (वय- ३० वर्षे, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) हिने फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत .


























