सोलापूर : शहरातील घोंगडे वस्ती परिसरातील ९ वर्षीय बालकाचा संशयित रेबीजमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र संबंधित बालकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता की त्याच्या उघड्या जखमेवर चाटल्यामुळे संसर्ग झाला, याबाबत अद्याप संभ्रम कायम असून पोस्टमार्टम अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घोंगडे वस्ती परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला वेग दिला असून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
घोंगडे वस्ती येथील समर्थ योगिनाथ स्वामी (वय ९) या बालकाचा शुक्रवारी संशयित रेबीजमुळे मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी त्याच्या पायावरील जखमेवर एका भटक्या कुत्र्याने चाटल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र कुत्र्याने चावा घेतला होता की केवळ जखम चाटली होती, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोस्टमार्टम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घोंगडे वस्ती परिसरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले असून यापूर्वी मोहीम राबविल्यानंतर उर्वरित सात कुत्र्यांनाही निर्बीजीकरणासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित कुत्र्याचाही शोध घेण्यात येत आहे. संबंधित कुटुंबातील सदस्यांनाही प्रतिबंधात्मक अँटी रेबीज लस देण्यात आली असून परिसरात आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती महापालिके चे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले यांनी दिली.भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास किंवा उघड्या जखमेचा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क आल्यास तातडीने वैद्यकीय उपचार आणि अँटी रेबीज लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले यांनी स्पष्ट केले.
चार वर्षांतील संशयित रेबीजचा पहिला रुग्ण
गेल्या चार वर्षांनंतर शहरात संशयित रेबीजचा हा पहिला रुग्ण आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा रुग्ण कॅटेगरी-३ प्रकारात मोडत असल्याचे दिसून येत आहे. रेबीजच्या जोखमीच्या दृष्टीने रुग्णांचे सामान्य संपर्क, ओरखडे आणि चावा अथवा उघड्या जखमेचा संपर्क अशा तीन कॅटेगरींमध्ये वर्गीकरण केले जाते, असे डॉ. चौगुले यांनी सांगितले.
उघडी जखम असल्यास विशेष काळजी घ्या
उघडी जखम असलेल्या व्यक्तींनी कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या संपर्कापासून दूर राहावे. अशा जखमेवर प्राण्याची लाळ लागल्यास संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत वेळ न दवडता जखम स्वच्छ धुवून तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यक अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले यांनी केले आहे.
—-