सोलापूर – जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता राज्यातील अव्वल जिल्ह्यांच्या बरोबरीने नेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट’ (पीजीआय-डी) निर्देशांकात जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष (डीक्यूसी) बैठका घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) वेळापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याते अरुण पाटील, शोभा मिसाळ, डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ. गजेंद्र जमादार तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीजीआय-डीच्या निकषांनुसार सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. इतर आघाडीच्या जिल्ह्यांशी तुलना करून उणिवा, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि आगामी काळातील कृती आराखड्यावर सखोल चर्चा झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षा, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (सीपीडी) प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, समुदाय सहभाग आणि शाळा गुणवत्ता तपासणी या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठक घेणे अनिवार्य करण्यात आले असून त्याचा अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा लागणार आहे.
चौकट
यू-डायस प्लस, परख आणि प्रबंध या प्रणालींमध्ये माहिती वेळेत व अचूक भरणे, डेटा पडताळणी, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वंकष मूल्यमापन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी यावरही विशेष भर देण्यात आला.
कोट
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समन्वयाने कार्य करावे
शासनाच्या सर्व शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना दर्जेदार, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 4