पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी गुरुवारी (दि.१८) पंढरपूर केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. या निवडणूकीत बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत हे भाजपाकडून तर पंढरपूर येथील राष्ट्रवादी (श.प.गट) काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या मध्ये लढत होत आहे. या दोघांचेही भवितव्य आता मतदान पेटी मध्ये बंद झाले आहे. त्यामुळे येथील मतदारांनी दोघांपैकी नेमका कोणाला कौल दिला या बद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या निवडणूकीचा निकाल येत्या सोमवारी (दि.२२) लागणार आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी येथील तहसील कचेरी मधील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. सकाळी आठ ते चार या वेळात ही मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पुर्णपणे शांतते मध्ये पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. येथील तहसीलदार, प्रांताधिकारी सातत्याने मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. पंढरपूर मतदान केंद्रावर एकुण शंभर एवढी मतदारांची संख्या होती. त्या मध्ये ५४ पुरुष आणि ४६ स्त्री मतदारांचा समावेश होता. सकाळी आठ ते दुपारी १२ वाजे पर्यंत १७ पुरुष आणि १३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता त्या मुळे सकाळच्या या सत्रात मतदानाची टक्केवारी अवघी ३० टक्के ऐवढी होती. त्या नंतर सकाळी आठ ते दोन वाजे पर्यंत ५३ पुरुष तर ४१ महिला मतदारांनी आपले मतदान केले होते. त्यामुळे मतदानाची एकुण टक्केवारी ९४ टक्यांपर्यंत गेली होती. दरम्यान मतदानाची वेळ संपताना अर्थात दुपारी चार वाजे पर्यंत ५४ पुरुष आणि ४६ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यामुळे पंढरपूर केंद्रावर मतदानाची टक्केवारी शंभर इतकी झाली.
दरम्यान गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या निवडणूकीसाठी येथील महायुतीचे पदाधिकारी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपआपल्या मतदारांशी संपर्क साधण्याचे काम करीत होते. भाजपाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी देखील येथे येवून महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट ),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच मित्रपक्षाच्या मतदारांच्या गाठीभेटी घेवून गेलेले होते. यावेळी त्यांनी देखील विरोधी पक्षातील मतदारांशी देखील आपला चांगला संपर्क आहे. ही जिल्ह्याची निवडणूक आहे. त्यामुळे आपला, परका असे या निवडणूकीत काही नाही. अनेक अदृष्य शक्ती आम्हाला मतदानासाठी उत्सुक असल्याचे सांगून आम्ही सर्व मतदारबंधुभगिनींशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती. कारण पालकमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीला प्रयत्न केलेले होते. मात्र त्या मध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी जिंकण्यासाठी त्यांनी आपली संपुर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे महायुती मधील घटक पक्ष असलेल्या सर्व आमदार,पदाधिकारी यांना पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देवून निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी कामाला लावलेले दिसून आले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आपली ताकद पणाला लावली होती. जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी ही निवडणूक जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेंमधील मतदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून अनेक अदृश्यशक्ती सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जागृक ठेवण्यासाठी तसेच आपल्या जिल्ह्याचा ताठ कणा,बाणा अबाधित ठेवण्यासाठी आमच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी पालकमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्या उमेदवाराला आपल्या मतदारांचा पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची थोडी ताकद ऐनवेळेला कमी झालेली दिसत होती. तरी देखील ऐन उन्हाळ्यात सुध्दा आमचा वसंत फुलणार अशी नेमकी आणि मार्मिक प्रतिक्रिया देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी आपले उमेदवार वसंतराव देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात असल्यामुळे या निवडणूकीत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार या बद्दलचा फैसला आता येत्या सोमवारी (दि.२२) मतमोजणी नंतर समोर येणार आहे.
—————–
चौकट : ( पालकमंत्र्यांकडून वैयक्तीक गाठीभेटी )
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने विधानपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती. कारण जिल्ह्याची धुरा पालकमंत्र्यांच्या खांद्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांवर या निवडणूकीची संपुर्ण जबाबदारी सोपविलेली होती. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी येथील मनसेचे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे येथील नेते अनिल सावंत तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सावंत यांच्या मार्फत पंढरपूर पालिकेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके आणि त्यांचे पती भगिरथ भालके यांच्याशी देखील संपर्क साधुन एक, एक मतांसाठी व्युहरचना आखली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी अबकी बार पाचशो पार चा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीकडून दिलेला पाचशे पार चा नारा कितपत खरा ठरतो हे आता मतमोजणी नंतर समजू शकणार आहे. त्यावरच पालकमंत्र्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली की नाही हे सष्ट होणार आहे.
Post Views: 11