आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल.
गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात नियमानुसार पक्ष फुटलेला नसताना विधिमंडळात फूट झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी अपात्र करावे, अशी ठाकरे गटाची याचिका होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले होते. त्या अनुषंगाने गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर दोन्ही गटाच्या आमदारांनी मिळून विधानसभा अध्यक्षांना एकत्रित उत्तर पाठवले होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी याचिका केली होती. त्यानुसार शिंदे गटाच्या १६ आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे.
उचित कारवाई सुरू – विधानसभा अध्यक्ष
यावर प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात, त्यावेळी ते ‘क्वासी ज्युडिशियल अथाॅरिटी’ (अर्ध न्यायिक) म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल. लवकरच याबाबत सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.