राज्यातील गृह विभागाने १७ हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील ४८ तर ग्रामीण पोलिसांकडील ९४ पदे आहेत. उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस भरतीत ज्यांची वयोमर्यादा नुकतीच संपली, त्यांनाही संधी मिळावी आणि सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या निकालापर्यंत अर्ज करण्याची मुदत असावी, अशा दोन प्रमुख मागण्या जोर धरू लागल्या आहेत.आता जाहीर झालेल्या भरतीला लोकसभेच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळू शकतो.दरम्यान, उन्हाळा संपताच अर्जदार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांची एकदाच लेखी परीक्षा उरकली जाणार आहे. साधारणत: नाव्हेंबर-डिसेंबरमध्ये या भरतीतील निवड झालेल्या नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. पहिल्यांदा उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल.