नागपूर, 20 जुलै
(हिं.स.) : नागपूरसह पूर्व विदर्भात दमदार पावसाने
हजेरी लावली आहे. भंडारा येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणि नागपुरात आज, शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक शाळांना सुटी देण्यात आलीय.भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठे जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. तर, काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांची रात्री चांगलीच तारांबळ उडाली.
मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्यांची चांगलीच नासाडी झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातही शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरूवात
झालीय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्ते ओस बडले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी तुंबल्याची तक्रार देखील पुढे आली आहे. मुसळधार पाऊस पाहता नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयाने सकाळी 8 वाजता सुटी जाहीर केली. परंतु, शनिवार असल्यामुळे अनेक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतात.
त्यामुळे सुटी जाहीर होईपर्यंत सकाळी 6 ते 8 या वेळेत अनेक मुले शाळेत गेली होती. त्या सर्वांना पावसामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. दरम्यान वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून तेथे देखील शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने राज्यातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. तर रत्नागिरी आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय.