तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी : विधानपरिषदेत उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या कलगीतुऱ्याचा पुढचा अंक विधानसभेत पहावयास मिळाला. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना उद्देशून ‘गद्दार’ असा उल्लेख केल्याने शिंदे गटाचे मंत्री व आमदार खवळले.
दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने कामकाज दहा मिनिटासाठी तहकुब करावे लागले. या वादाच्या केंद्रस्थानी होते उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे. शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही,असे म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. त्यावेळीच आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडे पाहात आता या ‘गद्दारांचे ऐकायचे का?’ असा प्रश्न विचारला. त्यामुळे शिंदें गटाचे आमदार आक्रमक झाले.गोधळमुळे सदनाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
एकनाथ शिंदे यांनी 293 च्या प्रस्तावावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेला झोंबतील असे मुद्दे मांडत राज आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, मतदानाआधी म्हणायचे मराठी मराठी, आणि मतदान झाले की ‘कोण रे तू’ अशी भूमिका तुमची. कोविड काळात खिचडी घोटाळा आणि डेडबॉडी बॅग चोरणारे सत्ताधारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत? मिठी नदीगाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया याची चौकशी सुरू आहे. जर त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा टोलाही आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला.शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर भास्कर जाधव आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यावर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र तसे करता येणार नाही,असे विधानसभा अध्यक्षांनी नियमाचा हवाला देत सांगितले. यावरून गदारोळ सुरू असताना आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी शिंदेंच्या आमदारांना पाहून आता ‘गद्दारांचे ऐकायचे का?’ असा प्रश्न विचारला.त्यामुळे चिडलेल्या शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांकडे पाहून हातवारे करणे, इशारे करणे हे चुकीचे असून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी गैरवर्तन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देसाई यांनी केली .