तभा फ्लॅश न्यूज/ तेर : धाराशिव जिल्ह्याची तहान भागवणारे मुख्य तेरणा धरण जोरदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, हे पाणी आता तेरणा नदीत सोडण्यात आले आहे.
या पावसामुळे धाराशिव शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळग्रस्त भागात ऑगस्ट महिन्यातच धरण भरल्याने हे दृश्य दिलासादायक ठरत आहे.
दुसरीकडे, धरण ओव्हरफ्लो झाल्याने तेरणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तेरणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने तेरणा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाण्याची आवक वाढून शुक्रवारी पहाटे तो ओव्हरफ्लो झाला. यामुळे धाराशिव शहरासह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

















