उद्धव ठाकरे यांनी ष्णमुखानंद हॉलमध्ये शिवसैनिकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित केलं. उद्धव ठाकरे यांनी जो बायडन यांच्या घरावर एफबीआयनं टाकलेल्या छाप्याचा आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. गद्दार विकले जाऊ शकतात, खोक्यांनी गद्दार विकत घेतले जाऊ शकतात. पण शिवसैनिकांचं प्रेम विकलं जाऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज दुपारी पत्रकार परिषद झाली, प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही वर्षांपूर्वी कलिना येथे विद्यापीठात मी आणि रामदास आठवले एकत्र आलो होतो. पण, रामदास आठवले हे भाजपच्या कळपात गेले. त्यामुळं आज प्रबोधनकारांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदु्त्वाच्या नावावर एक भिंत तयार करुन पोलादी पकड तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना हिंदुत्त्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेल्याचं सांगत सरकार पाडलं. पण, तुम्ही शरद पवारांचं फोनवरुन मार्गदर्शन घेतो असं म्हणतात, मग माझं काय चुकलं होतं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारसरणीचे आणि संघ उजव्या विचारसरणीचा आहे. सध्या सरळ सरळ वारसा हडपण्याचा डाव आहे. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र या काळात त्यांचा सहभाग नव्हता. कोणी कितीही असले तरी मोदी असले तरी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असल्याशिवाय मतं मिळत नाहीत हे तुम्ही मान्य केलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करु शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा अंध आहेत. २००२ पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. ६५० कोटी तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली आणि ठेवी निर्माण झाल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात येणारे उद्योग पळवले, आर्थिक केंद्र पळवले, फिल्मसिटी पळवायला आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. मुंबई महापालिका स्वत:च्या खर्चातून रस्ता बनवत आहे. कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून होत आहे. त्यातील ३०-४०% रक्कम हा कामगारांचा, भविष्य निर्वाहाच्या निधीचा, ग्रॅच्युएटी आणि इतर कामांचा आहे. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, आम्हाला ती मातृभूमी वाटते. ते शाहकारी असतील पण त्यांना ती कापायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कोश्यारींनी पदावरुन दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. फार लवकर त्यांना शहाणपण सुचलं. त्यांना हाकलून द्यायला हवं होतं. महाराष्ट्रातील महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान त्यांनी केला.महापुरुषांचा अपमान होऊनही गप्प बसणारी माणसं बाळासाहेबांची असू शकतात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.