उदगीर / लातूर – मागील महिन्यात मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधित भागांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
अभाविप ने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसेच विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांतील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याने संबंधित महाविद्यालये व विद्यापीठांनी त्यांच्या फेरपरीक्षांचे आयोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी पूरग्रस्त भागांतील असल्याने या वर्षभरात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म शुल्क माफ करण्यात यावे तसेच त्यांना सरसकट ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी “कमवा व शिका” योजनेचा लाभ वाढवून तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून ते शिक्षणाशी जोडलेले राहतील. तसेच पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे नुकसानग्रस्त झाल्याने त्यांना सर्व कागदपत्रे विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासनाने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली असली तरी अद्याप तिची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता दि. १४ नोव्हेंबर रोजी अभाविपतर्फे ‘भीक द्या’ आंदोलन आयोजित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाय-कॉर्नर ते मेन बिल्डिंगपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे म्हणाल्या की, “वारंवार निवेदन देऊनही शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठ म्हणते की शासनाचा कोणताही GR आलेला नाही, परंतु शासनाने निर्णय घेतलेला असून विद्यापीठ त्याची अंमलबजावणी करण्यास अकार्यक्षम आहे. तत्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.”
महानगर मंत्री चिन्मय महाले म्हणाले की, “मराठवाड्यातील ही अभूतपूर्व परिस्थिती असून विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पुरामुळे घायाळ झाली आहेत, त्यांना सर्व कागदपत्रे विनाशुल्क उपलब्ध करून द्यावीत.”
या आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, महानगर मंत्री चिन्मय महाले, महानगर सहमंत्री श्रीराम उदे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















