माहूर / नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षित पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे चालवली जाणारी मानव विकास मिशनची बस सेवा माहूर तालुक्यातील शेलू, गंगाजी नगर, करंजी, मनीरामखेड, लोकरवाडी, सिंदखेड आणि गोंडवडसा या परिसरातून सुरू करण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते लक्ष्मीकांत ऊर्फ पिंटू पाटील वायफणीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि विभागीय वाहतूक नियंत्रक, नांदेड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून दूरवर असलेल्या सेलू,करंजी,
गंगाजीनगर,मनिरामखेड, लोकरवाडी, सिंदखेड आणि गोंडवडसा या गावपरिसरातील मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थ्यांना उशिरा शाळा – महाविद्यालयात पोहोचणे, वाढता वाहतूक खर्च आणि असुरक्षित प्रवास अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत सुरक्षित आणि मोफत वाहतूक सुविधा देण्यासाठी या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे.ज्यामुळे त्या शाळेतील शिक्षण पूर्ण करू शकतील.
या भागातील मुलींना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा पुरविण्यात आल्यास त्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहतील व शिक्षण सोडणार नाहीत.या भागातील मुली, विशेषतः ज्यांना शाळा लांब असल्याने शिक्षणात अडचणी येत असल्याची कैफियत निवेदनातून पिंटू पाटील यांनी संबंधित प्रशासनापुढे मांडली आहे.
काही दिवसांपूर्वी पिंटू पाटील वायफनीकर यांच्या मागणीवरून आमदार हेमंत पाटील यांनीही आगारप्रमुख किनवट, माहूर आणि विभाग नियंत्रकांना सदरील मार्गावर मानव विकास मिशनची बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशा आशयाचे पत्र दिले होते. परंतु , अद्यापही या मार्गावर बस फेरी सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांनीही या मागणीला मोठा पाठिंबा देत या मार्गावर मानव विकास मिशनची बससेवा त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त केली जात असून या मार्गावरून माहूरला शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ मानव विकास मिशनच्या बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी पिंटू पाटील वायफणीकर यांनी सर्व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.























