वाशी / धाराशिव – वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. मागील हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा राहिलेला दुसरा हप्ता २०० रुपये प्रति टनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर (दि.२४) नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आला आहे.
माजी मंत्री तथा परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून चालू वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन हा हप्ता तातडीने देण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत आणि व्हाईस चेअरमन केशव सावंत यांनी दिली. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये एकूण १५०६६१.१६१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यातील पहिली उचल शेतकऱ्यांना २६०० रुपये प्रति टन देण्यात आली होती. त्यातील राहिलेला दुसरा हप्ता आता २०० रुपये प्रति टनाने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

आगामी गाळप हंगाम २०२५-२६ साठी देखील शेतकऱ्यांना योग्य ऊसाला दर देण्यात येईल असे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज जोमाने सुरू असून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा आणि परिपक्व ऊस गाळपासाठी भैरवनाथ शुगरला द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन केशव सावंत यांनी केले आहे.


























