सोलापूर – स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्युत विभाग अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्मार्ट मीटरचा व अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला. स्मार्ट मीटर बसवणे बंद करून ज्यांना लावले असतील ते मीटर काढण्यात यावे अन्यथा स्मार्ट मीटर फोडन्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला.
अदानी समूह कंपनी मार्फत वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजेच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहे. हे मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती केली जात आहे. ग्राहक घरी नसताना त्यांचे बाहेरील भिंतीवरचे मीटर परस्पर त्यांच्या परवानगी शिवाय बदलले जात आहेत. इथून पुढे तुमच्या घरी मीटर रीडिंग साठी लाईट ऑफिसचे कर्मचारी येणार नाहीत व हे स्मार्ट मीटर कंपल्सरी बसवणे बंधनकारक आहे. असे सांगून ग्राहकांचा फसवणूक करत आहेत. हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना दुप्पट ते तिपटीने बिल वाढवून येत आहे. या मीटरच्या वाढीव बिला संदर्भात नागरिक लाईट ऑफिसला गेले असता तिथल्या अधिकारी त्यांची दखल घेत नाहीत.
पूर्वीचे मीटर बदलून नवीन मीटर बसवले आहेत ते काढून तत्काळ जुने मीटर बसवून द्यावेत व ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दुपटी-तीपटीने जे वीज बिल आकारण्यात आले आहेत त्यांचे बिल त्वरित कमी करावे. नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये अन्यथा असे जर झाले नाही तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र अशा स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महानगर प्रमुख जगदाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनलदास, गणेश कदम, मनीषा कोळी,सुनीता घंटे, राजेंद्र माने, शेखर भोसले, सिद्धाराम सावळे, सतीश वावरे, जरयाब आबादिराजे, साहिल बागवान, अस्लम शेख, मुरतुज शेख, इस्माईल शेख, गऊस शेख, शफिक मकाशे आदी उपस्थित होते.



















