किनवट / नांदेड : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी श्री क्षेत्र माहूरगड पर्यटनस्थळाच्या समग्र विकासासाठी करण्यात आलेल्या ८२९.१३ कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी म्हणून राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची विशेष भेट घेऊन आवश्यक निवेदन सादर केले.
नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन अनुप्रयोग केंद्रात मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत माहूरगड पर्यटन विकास आराखड्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याने, आराखड्यास तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी आमदार केराम यांनी शासनदरबारी प्रखर पाठपुरावा सुरू केला आहे.
आ. भिमराव केराम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष विनंती
आमदार केराम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र माहूरगड हे प्रमुख शक्तिपीठ, श्री रेणुकामातेचे स्थळ, तसेच दत्तसंप्रदायाचे जन्मस्थान असून वर्षभर लाखो भाविक येथे भेट देतात परंतु विद्यमान सुविधा वाढत्या गर्दीपुढे अपुऱ्या पडतात. जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केलेला ८२९.१३ कोटी रुपयांचा भव्य पर्यटन विकास आराखडा शासनाने ६ मे २०२५ रोजी तत्वतः मान्य केलेला आहे.
आता अंतिम मंजुरी उच्चाधिकार समितीकडून देणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने, “मा. मुख्य सचिवांना आवश्यक त्या सूचना देऊन आराखड्यास अंतिम मान्यता मिळण्यास सहकार्य करावे,” अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. शासकीय पत्रव्यवहारास गती, मुख्य सचिवांची भेट घेतली सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन अधिवेशनादरम्यान आमदार केराम यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन, पर्यटक सुविधा, धार्मिक स्थळांचे संवर्धन, वाहतूक मार्ग, मूलभूत सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा संवर्धन आदी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी मुख्य सचिवांना योजना किती जनहिताची व क्षेत्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे हे स्पष्टपणे पटवून दिले व मंजुरीसाठी निवेदन दिले.
८२९.१३ कोटींचा विस्तृत मास्टर प्लॅन — दोन टप्प्यात कामे
आराखडा पुढीलप्रमाणे :
• टप्पा १ : ₹३९६.२२ कोटी
• टप्पा २ : ₹४३२.९१ कोटी
या आराखड्यात पुढील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास प्रस्तावित आहे :
• श्री रेणुकामाता मंदिर परिसर
• दत्तशिखर
• अनुसया माता स्थळ
• वनदेव मंदिर
• मातृतीर्थ कुंड
• सोनापीर परिसर
• शेख फरीद बाबा दर्गा परिसर
या सर्व ठिकाणांना समर्पक रस्ते, पार्किंग, पायाभूत सुविधा, धर्मशाळा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व पर्यटन सुविधा उभारल्या जाणार आहेत.
उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक सर्व विभागांना हजर राहण्याचे आदेश
नियोजन विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार (क्र. तीक्षेवि-२०२५/प्र.क्र.३३/का.१४४४-अ) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली असून वित्त, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आदी प्रमुखांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
माहूरगड विकास—प्रदेशातील आर्थिक प्रगतीस नवी चालना
आमदार केराम यांच्या म्हणण्यानुसार—
• आराखडा मंजूर झाल्यास नांदेड, किनवट, माहूर परिसरातील पर्यटन वाढ,
• नवीन रोजगारनिर्मिती,
• स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना,
• परिवहन व संपर्क व्यवस्था सुधारणा,
• आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधांची निर्मिती होईल.
आमदार केराम : “माहूरगडच्या विकासाची लोकाभिलाषा लवकरच पूर्ण होईल” आमदार भिमराव केराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “माहूरगडचे सर्वांगीण व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून रूपांतर करणे ही माझीच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाची लोकाभिलाषा आहे. आराखड्यास अंतिम मंजुरी मिळावी यासाठी मी स्वतः शासनाच्या प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याशी केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या प्रकल्पाला नक्कीच न्याय मिळेल.”

















