सोलापूर – मंद्रूप येथील ग्रामपंचायत वारंवार केवळ पुरस्कारासाठी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करून पुरस्कार मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती भरणे व लाखो रुपये खर्च करून दर्शनी भागात त्याचे प्रदर्शन करणे यासाठीच ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाचा अट्टाहास दिसून येत आहे . त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ऑनलाइन माहितीमुळेच यापूर्वी मंद्रूप ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा स्पर्धेत दोन पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी पावणेदोन कोटी रुपये बक्षीस हे मिळाले आहे. या पुरस्कारासाठी दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टी मंद्रूप मध्ये उपलब्ध नसतानाही गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रकारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी ग्रामपंचायत प्रशासन बोगस कारभार करीत असून बसस्थानक परिसरात कचरा पेटी बसवण्यात आली आहे .
केवळ ३०० मीटर परिसरात दहा ते पंधरा कचरापेटी दिसून येत आहेत, तर उर्वरित गावांमध्ये या कचरापेटींचा कुठेही पत्ताच लागत नाही . पुरस्कार देणाऱ्या समितीकडून या परिसराला भेट देण्यात येणार असल्याचे पाहून ग्रामपंचायतीने दर्शनी भागात कचरा संकलनासाठी हा खटाटोप केल्याचा दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दररोज कचऱ्याचा ढीग पडत असताना त्या ठिकाणी कचऱ्याची पेटी लावण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाला सुचले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी हद्दवाढ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडत असताना त्याचा विल्हेवाट लावण्याचा विचार ग्रामपंचायतकडे दिसून येत नाही. मात्र पुरस्कारासाठी बस स्थानक परिसरात दर्शनी भागात लाखो रुपये खर्च करून कचरापेटी लावण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरीकांच्या विकासापेक्षा पुरस्कार महत्त्वाचे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
….
नागरीकांना पुरस्काराचे महत्व नाही
….
पुरस्कार समिती गावात प्रवेश करताना बसस्थानक परीसराला भेट देऊन येत असल्याने ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळविण्यासाठी एका महिन्यात तीन वेळा स्वच्छता मोहीम राबविली आहे. त्याच ठिकाणी कचरापेटी बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समितीही इतर परीसराला भेट देण्याऐवजी याठिकाणी पाहणी करून पुरस्कारासाठी शिफारस करीत आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना पुरस्काराचे महत्व वाटत नाही.
….
सिईओंकडूनही नाराजी
…
जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी मंद्रूपच्या अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बसस्थानक परीसर वगळता इतर गावाना जोडणार्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. ग्रामपंचायत दुजाभाव करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
….
मदत नको, विकास हवा
…
मंद्रूप ग्रामपंचायत नागरीकांच्या मूलभूत सोईसुविधांकडे दुर्लक्ष करून सायकल , भांडी व खुर्च्या वाटप करणे. कचरा पेटी लावणे, यासारख्या गोष्टींमधून विकासनिधी खर्ची टाकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मदत नको, विकास हवा , अशि मागणी नागरीकांमधून होत आहे.
….
१) बसस्थानक परीसरातील कचरापेटी
२) ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कचरा

























