बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका- जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हे शिबीर दि. १७ ते २३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजासाठी योगदान देणे हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
शिबिराचे उद्घाटन प्रा. के. बी. चपटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संघभावना आणि सेवाभाव जपत गावाच्या विकासासाठी काम करावे, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानी डॉ. बी. डी. लांडे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले. युवकांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर झाला तर देशाचा शाश्वत विकास निश्चित साध्य होऊ शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमास मौजे कासारवाडीच्या सरपंच यांचे प्रनिधी नितीन मंडलिक उपस्थित होते. त्यांनी शिबीर काळात गावाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
या समारंभास बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण १०० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. के. एम. माळी यांनी तर आभार प्रा. एन. आर. सारफळे यांनी मानले.
या सात दिवसांच्या शिबिरामध्ये जलसंधारण, पडीक जमीन विकास, स्वच्छता, जनजागृती व सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची जाणीव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


















