सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार तथा तीन टर्म नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या प्रभागात तीव्र भावना उमटल्या. शहरातील अनेक नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या समस्या सोडविणारा, विकासकामांचा धडाडीने पाठपुरावा करणारा कर्तव्यदक्ष नगरसेवक हरल्याने प्रभागातील महिला व नागरिकांना दुःख अनावर झाले. अनेक महिलांनी त्यांच्या कार्यालयासमोर येऊन आपले दुःख व्यक्त केले.
तीन टर्म नगरसेवक म्हणून चंदनशिवे यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसह वैयक्तिक पातळीवर नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला. एखादी महिला असो वा सामान्य नागरिक, समस्या मांडताच तत्काळ तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वश्रुत होती. त्यामुळेच त्यांच्या पराभवाची बातमी समजताच अनेक महिला त्यांच्या मिलिंद नगरातील कार्यालयासमोर जमा झाल्या. आम्हाला पराभव मान्य नाही. आम्हाला अशाच कर्तव्यदक्ष नगरसेवकाची गरज होती, अशा भावना व्यक्त करत महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
महिलांचा आक्रोश पाहून आनंद चंदनशिवेही भाऊक झाले.यावेळी बोलताना आनंद चंदनशिवे म्हणाले, निवडणुकीत हार-जीत होतच असते. मी पराभूत झालो असलो तरी लोकसेवेचे काम थांबणार नाही. रात्रंदिवस नागरिकांसाठी काम करत राहीन, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या नगरसेवकाच्या पराभवाने हा प्रभाग अस्वस्थ असून, हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून जनतेच्या अपेक्षांचा असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

















