पंढरपूर – राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांनी सर्वांत जास्ती वेळा भूषविले आहे. एकीकडे सर्वात अधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याचा त्यांच्या नावावर विक्रम झालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी केवळ दोन वेळाच त्यांना संधी मिळाली आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आषाढी यात्रेच्या वेळी विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी येण्याचे दादांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले आहे. कारण विमान अपघातात मंगळवारी (ता.२८) दादांचा दुर्देवी मृत्यु झाला.
राज्याचे आराध्य दैवत आणि गोरगरीबांचा बालाजी म्हणून विठ्ठलाची सर्वदूर खात्यी आहे. दरवर्षी पंढरपूरात चार मोठ्या यात्रा भरत असतात. त्या चार यात्रांमध्ये आषाढी आणि कार्तिकी यात्रेला विशेष महत्व आहे. आषाढी यात्रेच्या वेळी देहू,आळंदीसह राज्याच्या विविध भागातून विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूरात विठ्ठलाच्या भेटीसाठी येत असतात. त्यामुळे आषाढी यात्रेच्या वेळी पंढरपूरात लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांची मांदियाळी असते. आषाढी यात्रेच्या वेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा करण्याची परंपरा आहे. मात्र राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युती शासनाच्या वेळी राज्यात भाजपासाठी खास उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले गेले. तेव्हा पासून आषाढी यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री तर कार्तिकी यात्रेच्या वेळी उपमुख्यमंत्री राज्याचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाच्या महापुजेसाठी येण्याची प्रथा सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांचा मित्रपक्ष असलेली शिवसेना त्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झालेली होती. मात्र त्यावेळी भाजपासाठी उपमुख्यमंत्रीपद तयार करण्यात आलेले नव्हते. त्यावेळी सुरुवातीला एकनाथ खडसे यांची महसूलमंत्रीपदी त्या नंतरच्या काळात चंद्रकांत पाटील यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती. त्यामुळे त्या टर्म मध्ये उपमुख्यमंत्र्यां ऐवजी महसूल मंत्र्यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याचा मान देण्यात आलेला होता.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून २०२० आणि २०२१ मध्ये अजित पवारांनी विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी हजेरी लावलेली होती. त्या नंतर २०१४ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्रीपदावर होते. त्यावेळी महसूल मंत्र्यांना हा पुजेचा मान देण्यात आलेला होता. त्या नंतर महसूल मंत्री पदावरुन खडसेंना पायउतार व्हायला लागल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात महसूल मंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे २०१५ पासून ते २०१९ पर्यंत सलग पाच वेळेला त्यांना पंढरपूरात येवून कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. दरम्यान अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून केवळ २०२० आणि २०२१ असे दोन वेळेलाच कार्तिकी यात्रेच्यावेळी विठ्ठलाची शासकीय महापुजा करण्याची संधी मिळाली. अजितदादांना अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळेच अजितदादांचे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आषाढी यात्रेच्या वेळी विठुरायाच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याचे स्वप्न हे अखेर स्वप्नच ठरले.
—————-
चौकट : ( कार्तिकीच्या महापुजेसाठीची यांची राहिली उपस्थिती )
लक्ष्मण ढोबळे ( पालकमंत्री २०१२).दिलीप सोपल (पालकमंत्री २०१३), एकनाथ खडसे ( महसूलमंत्री २०१४ आणि २०१५ ). चंद्रकांत पाटील ( महसूलमंत्री २०१६,२०१७,२०१८ आणि २०१९). अजित पवार ( २०२० आणि २०२१).देवेंद्र फडणवीस ( उपमुख्यमंत्री असताना २०२२ आणि २०२३), चंद्रकांत पुलकुंडवार ( विभागीय आयुक्त पुणे आचारसंहितेमुळे २०२४) त्या नंतर एकनाथ शिंदे ( उपमुख्यमंत्री २०२५)
———————
चौकट : केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद तसेच उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे या दोन जणांनाच आषाढीच्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

















