नांदेड – श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त मौजे घोगरवाडी तालुका किनवट या तेलंगणा व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम अशा गावात महाराजांचे सत्संग प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजामध्ये वावरताना पैशापेक्षाही नीती व धर्माने आचरण केले तरच समाजात प्रतिष्ठा इज्जत राहते त्याप्रसंगी दृष्टांत देताना महाराजांनी जंगुबाईचे उदाहरण दिले जंगुबाईकडे कुठलीही संपत्ती, वैभव नव्हते पण त्या नीती व धर्माने आचरण करत असल्यामुळेच आज समाजात गावोगावी त्यांची मंदिरे आहेत फोटो आहेत समाज त्यांची पूजा करतो त्यांना वंदन करतो.
आज समाजामध्ये आपल्या निजधर्मापासून आपल्याला दूर करणाऱ्या बाहेर काढणाऱ्या शक्ती आपल्या सभोवताली कार्यान्वित आहेत आणि म्हणूनच आपले चारित्र्य आणि आपला धर्म आज सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. आपण चांगले आचरण करू लागलो तर वाईट आचरण करणाऱ्याला अडचण निर्माण होते म्हणून ते आपल्याला काहीतरी अमिष किंवा लालूच दाखवून आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात. जो नीतीने आचरण करणार नाही त्याचे निश्चितच पतन झाल्याशिवाय राहत नाही.
एकमेकांचा द्वेष ईर्षा मत्सर हे मनुष्याला भजन करू देत नाहीत आणि देवाचे नामस्मरण भजन केल्याशिवाय हे अवगुण जात नाहीत. म्हणून मनुष्याने जास्तीत जास्त नामस्मरण भजन करून आपले हित करावे व धर्माने नीतीने आचरण करून एक सुसंस्कारित नागरिक व्हावे असे आवाहन महाराजांनी आपल्या प्रवचनातून केले.
अतिशय दुर्गम भागात सुद्धा एवढ्या छान प्रकारे नामस्मरण,भजन,गुरुचरित्र पारायण, किर्तन चालू असल्याबद्दल महाराजांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भजनी मंडळ मांडवा यांनी सुंदर भजने सादर केली व समस्त गावकरी मंडळीं घोगरवाडीच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

























