करकंब – करकंब ते उंबरे करोळे ता.पंढरपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व चाऱ्या पडल्याने या रस्त्यावरील साईड पट्ट्यांचे मुरमीकरण न झाल्याने,रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या झाडाझुडपांच्या फांद्यांमुळे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह वाहनचालकांचे हाल होत होते.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत होते याबाबतचे वृत्त दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाले होते.त्या वृत्ताची संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी दखल घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या झाडाझुडपांच्या फांद्या काढण्याचा कामास सुरुवात करण्यात आली आहे.
संबंधित ठेकेदार,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे,साईड पट्ट्यांचे मुरमीकरण करणे,झाडाझुडपांच्या फांद्या काढणे ही सर्व कामे चांगल्या दर्जाची करण्यात यावीत अशा प्रकारची मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक,व्यापारी विद्यार्थी,नागरीक,नौकरदार वर्ग, शेतकरी व वाहन चालकांकडून करण्यात आली आहे.
या रस्त्याची गुणवत्तापूर्वक व योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्यास सोलापूर ते अकलूज,मोडलिंब ते अकलूज, कुर्डूवाडी ते अकलूजमार्गे शिखर शिंगणापूर अशा अनेक एसटीच्या फेऱ्या सुरू होतील.या एसटी बसेस चालू झाल्यास या मार्गावरील शेतकरी,व्यापारी,भाविक,नागरिक वाहनचालक,विद्यार्थी यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
मोडलिंब,करकंब,जळोली,उंबरे करोळे,श्रीपुर या भागातील नागरिक अकलूज तसेच माळशिरस,नातेपुते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी याच मार्गावरून प्रवास करत असतात.
या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वृद्ध,रुग्ण,गरोदर महिला यांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता.करकंब येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.या खराब रस्त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी जाणेही कठीण झाले होते..






















