परळी वैजनाथ : – लोकनेते मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तरूण कार्यकर्त्यांबरोबरच ज्येष्ठांचंही नेतृत्व माझ्याकडं आलं. तो काळ तसा कठीणच होता, पण साहेबांच्या पश्चात राजकारणात दादा-आबांसारखे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, माझ्या प्रत्येक निर्णयात, संकटात आणि संघर्षात सोबत राहिल्यामुळेच मला साहेबांच्या जाण्याचं दुःख पचवता आलं शिवाय राजकारणातला प्रवास इथपर्यंत करता आला. ही माणसं सोन्यासारखी आहेत, त्यांना आपण सर्वांनी मिळून जपायचं आहे असे भावोदगार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे काढले.
शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे (दादा) आणि दत्तापा इटके (आबा) यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल भाजपच्या वतीने त्यांचा आज अमृत महोत्सवानिमित्त पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ह्दय सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर गौरवमूर्ती इटके, डुबे यांच्यासह जयमाला डुबे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदराव केंद्रे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, स्वागताध्यक्ष तथा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर पंकजाताई मुंडे यांच्याहस्ते दत्ताप्पा इटके आणि विकासराव दुबे यांचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात औक्षण करण्यात आले.

यावेळी बोलतांना पंकजाताई पुढे म्हणाल्या, जेव्हापासून राजकारण बघते आहे तेंव्हापासून काही चेहरे राजकारणात कायम दिसतात, दत्ताप्पा आणि डुबे काका यांचा ही यात समावेश आहे. त्यांच्या जीवनकार्याला वंदन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, आजचा हा सोहळा बघून माझे मन भरून आलं आहे. आपण सर्व रक्ताच्या आणि पक्षाच्या नात्याने नाही तर संस्कारांच्या नात्याने इथे एकत्र आलो आहोत. परळी शहरात अशा प्रकारचं वातावरण कायम रहावं अशी प्रार्थना वैद्यनाथकडे करते असे त्या म्हणाल्या.
लकीरे हमारी भी खास है…!
पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, अमृता सारख्या सज्जन माणसांचा सहवास आपल्याला लाभला आहे. सज्जन माणूस बोलत नसला तरी त्यांचा आवाज फार मोठा असतो. त्यांचा आवाज कुणी दाबू शकत नाही. ही सर्व सज्जन आणि अमृतासारखी माणसे माझ्या पाठीशी आहेत म्हणून माझा आवाज कुणी दाबू शकत नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर या माणसांची साथ मला कायम मिळत गेली. आज जेंव्हा दत्ताप्पा आणि विकास काकांच्या जीवनकार्याची चित्रफीत बघितली तेंव्हा मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण आली. मुंडे साहेब जर आज आपल्यात असते तर म्हणाले असते “लकीरे हमारी भी बहोत खास है क्यूँ की आप जैसे हमारे साथ है”.या सोहळ्याच्या माध्यमातून डुबे आणि इटके काकांसारख्या कर्मयोगी माणसांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले. आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एकत्र असण्यासारखे दुसरे कोणतेही मोठे सुख नाही. त्यांचे कुटुंब एकत्र आहे, हे सुख बघत बघत त्यांनी आयुष्याची शंभरावी साजरी करावी अशा सदिच्छा देते असं त्या म्हणाल्या.
पंकजाताईचं भविष्य उज्ज्वल ; त्यांना अजून मोठा नेता झालेलं पहायचयं – इटके गुरूजी
पंकजाताई आपल्या सर्वांच्या नेत्या आहेत, त्यांनी पालकमंत्री असताना केलेलं काम विसरता येणं शक्य नाही. पंकजाताई मुख्यमंत्री पदापर्यंत पोचाव्यात अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे, अशा नेतृत्वासाठी आपण आपले काम चालूच ठेवायचे आहे, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रितमताई देखील खासदार म्हणून उत्तम काम करत आहेत, या दोघीही आपल्या पाठिशी असल्याने आपल्याला भितीचे काहीच कारण नाही असे इटके गुरूजी सत्काराला उत्तर देताना म्हणाले. तर डुबे यांनी समाज सेवा करण्यासाठी आपली साथ कायम मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पंकजाताई आणि दोन्ही परिवाराच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक, व्यापारी, महिला व भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















