बार्शी – तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे जवळगाव व हिंगणी हे दोन मध्यम प्रकल्प दीर्घकाळापासून दुरुस्तीअभावी दुर्लक्षित राहिले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित कामांना गती देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरु झाल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे.
जवळगाव व हिंगणी हे दोन्ही प्रकल्प बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मुख्य आधार आहेत. तसेच अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही या प्रकल्पांवर अवलंबून आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून मुख्य कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या या कालव्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती होत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दोन्ही प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या नियामक मंडळाच्या ११० व्या बैठकीत दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रम (MIIP) फेज-२ अंतर्गत राज्यातील १५५ प्रकल्पांमध्येही जवळगाव व हिंगणी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत होती.
या अनुषंगाने आमदार दिलीप सोपल यांनी दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य, यांना पत्राद्वारे सविस्तर मागणी सादर केली होती. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता देणे व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती, कालव्यांतील गळती, दुरुस्तीची तातडीची गरज आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीनंतर आमदार दिलीप सोपल यांनी माहिती देताना सांगितले की, जवळगांव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यासाठी आवश्यक अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास शासन स्तरावर गती दिली जाणार असून, मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देऊन कामे तातडीने मार्गी लावण्यास सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालव्यांतील गळती रोखली गेल्यास पाण्याचा अपव्यय थांबून सिंचन व्यवस्थेत सुधारणा होईल. परिणामी शेती उत्पादन वाढीस लागून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.






















