टेंभुर्णी : करमाळा तालुक्यातील कंदर–सातोली येथील बंद पडलेल्या शिवरस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी शुक्रवारी (६ मार्च) शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अखेर तहसीलदारांनी दूरध्वनीवरून रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र १० मार्चपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर ११ मार्च रोजी पुन्हा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
कंदर–सातोली हा पारंपरिक शिवरस्ता असून या मार्गावर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी, घरे तसेच शाळा आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता अडवला गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी २०२३ पासून प्रांत कार्यालयासह संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
शुक्रवारी आंदोलनादरम्यान अजित फरतडे, नागनाथ चव्हाण आणि राजेंद्र जगताप या शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व विजयकुमार लोकरे यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले. तहसीलदार प्रत्यक्ष उपस्थित नसल्यानेही आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना समजावून घेतले आणि पुढील अनर्थ टाळला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यालगत असलेल्या ओढ्यातील भाग पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे रस्ता भरण्याची गरज आहे. मात्र संतोष फरतडे व बिबीशन उर्फ दादा फरतडे यांनी या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडवून रस्ता भरण्यास विरोध केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पुढील भागात गणेश फरतडे व दीपक फरतडे यांनी रस्ता अरुंद करून दुरुस्तीला अडथळा निर्माण केल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी हा शिवरस्ता पूर्णपणे बंद पडला असून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठा वळसा घालून जावे लागत आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. रस्ता तातडीने भरून देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडली. अखेर तहसीलदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर १० मार्चपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले तरी दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास ११ मार्च रोजी पुन्हा आत्मदहन आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या वेळी करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टिळेकर तसेच इतर पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. आंदोलनात महिलांसह सुमारे शंभरहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
*चौकट*
*आंदोलनातील ठळक मुद्दे*
*कंदर–सातोली शिवरस्ता तीन वर्षांपासून अडथळ्यांमुळे बंद*
*रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन*
*संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न*
*पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला*
*तहसीलदारांकडून १० मार्चपर्यंत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन*
*मुदतीत काम न झाल्यास ११ मार्चला पुन्हा आंदोलनाचा इशारा*
*आंदोलनात महिलांसह सुमारे १०० शेतकरी सहभागी*


















