सांगोला – आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेत नेहमीच आपले वर्चस्व राहिले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण कमी पडलो. झालेल्या पराभवाचे शल्य बाजूला ठेऊन आणि झालेल्या चुका टाळून आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत केले.
यावेळी तानाजी पाटील, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड.यशराजे साळुंखे पाटील, डॉ.पियुष साळुंखे पाटील, समीर पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दिपक कांबळे यांनी मनोगतात आगामी काळात दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करून दीर्घकालीन राजकारण डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली.
आजपर्यंतच्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच पक्ष, पार्टी, जात, धर्म न पाहता कुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामे करत गेलो. तरीही, कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. याबाबत आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाची पद्धतीत बदल करू तसेच यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्यात येईल.
– दिपकआबा साळुंखे पाटील



















