सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथे व्यवस्थापन विभाग आणि ‘हिरकणी महिला सक्षमीकरण केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “ती आत्मविश्वासाची ज्योत” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि उद्योजकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी स्वागतपर भाषणात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रीतम कोठारी यांनी मांडली. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. गायत्री लिगाडे आणि प्रा. गायत्री बेनगिरी यांनी करून दिला. ‘हिरकणी’ महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅचरोपथी सल्लागार डॉ. सोनाली घोंगडे उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत संतुलित आहार, नियमित व्यायाम, नैसर्गिक उपचारपद्धती आणि सकारात्मक जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ‘फार्मसीड्स अॅग्रो’, सोलापूरच्या संस्थापक सौ. सविता जुजगार उपस्थित होत्या. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी उद्योजकतेतील स्वतःचा प्रवास सांगत महिलांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी नव्या संधींचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सौ. जुजगार यांच्या ‘फार्मसीड्स अॅग्रो’ या व्यवसायावरील माहितीपर डॉक्युमेंटरी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “उदयोन्मुख महिला उद्योजक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तन्वी मंथळ व कु. संजना मशाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रजनी क्षीरसागर यांनी केले. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.






















