धाराशिव – तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील करजखेडा पाटीजवळ रविवारी भीषण आणि विचित्र तिहेरी अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणार्या बोलेरो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या बोलेरोने प्रथम समोरून येणार्या वॅगनआर कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बोलेरो पलटी होऊन रस्त्याच्या दुसर्या लेनमध्ये जाऊन स्विफ्ट कारवर आदळली.
या तिहेरी धडकेत अपघात अत्यंत भीषण झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय 35), मोहन बुके (वय 55), अर्जुन पटुळे (वय 55) व आणखी एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय 40) असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ तुळजापूर-लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
























