बार्शी – जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालय बार्शी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १८ मार्च रोजी व्यापारी व व्यावसायिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ग्राहक हक्क, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि ग्राहक फसवणूक रोखण्यावर भर देत विशेष चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख यांनी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी जागरुक राहण्याचे आणि बाजारपेठेतील अनिष्ट प्रथांविरुद्ध सजग राहण्याचे आवाहन केले. सध्याच्या आखाती युद्धाच्या जागतिक परिस्थितीमुळे गॅस व इंधन टंचाई बाबतच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काहीजण ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तहसील प्रशासन व ग्राहक पंचायत संयुक्तपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार शेख पुढे म्हणाले की, १५ मार्च रोजी साजरा होणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ हा ग्राहकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची—सुरक्षितता, माहिती, निवड आणि तक्रार निवारण जाणीव करचन देण्यासाठी महत्त्वाचा आहे. २०२६ च्या “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक” (‘Safe Products, Confident Consumers’) या थीमनुसार ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार वस्तू मिळाव्यात, तसेच काळाबाजार व भेसळीसारख्या प्रकारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, हा उद्देश आहे.
व्यापाऱ्यांनी ग्राहकांना देव मानून सेवा देणे आवश्यक असल्याचे सांगत, ‘ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे’, असेही त्यांनी नमूद केले. समाजात प्रत्येकजण कधी ना कधी ग्राहक असतो, त्यामुळे परस्पर विश्वास आणि प्रामाणिक व्यवहार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज –दिनानाथ काटकर
यावेळी माहिती अधिकार जेष्ठ कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी ग्राहक फसवणुकीचे विविध प्रकार स्पष्ट करताना, ग्राहकांनी व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली. ग्राहकांनी कोणतीही शंका न बाळगता प्रश्न विचारणे, पावत्या जतन करणे आणि फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फसवणुकीकडे दुर्लक्ष केल्यास फसवणूक करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते इतरांनाही फसवतात, त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतामध्ये २४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो, तर १५ मार्च हा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
यावेळी तहसीलदार संजीवन मुंडे, नायब तहसीलदार रविंद्र सानप, पुरवठा अधिकारी निलेश आठवले, ॲड. विजय कुलकर्णी, व्यापारी बांधव व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्राहक जागरचकता वाढवून बाजारपेठेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
























