सोलापूर – जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कुशल जैन यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
संतभूमी आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सोलापूर नगरीत प्रशासकिय कारकिर्दीची नवी सुरुवात करताना आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. “संतांच्या पावन नगरीत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणार,” असे कुशल जैन यांनी सांगितले.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेतला. ग्रामीण भागातील विकासकामे, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात नवी ऊर्जा निर्माण झाली असून, विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत करत आगामी काळात समन्वयाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
कुशल जैन यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रियेला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
त्यांचे स्वागत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी केले. यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप , सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
चौकट
पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार
सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सोलापूर जिल्ह्याचा विस्तार आणि येथील भौगोलिक परिस्थिती पाहता, सद्यस्थितीत ‘पाणी टंचाई निवारण’ हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जैन म्हणाले की, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके हे अवर्षणप्रवण आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची जी कामे सुरू आहेत, ती योग्य रीतीने पूर्ण झाली आहेत का आणि त्यातून ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत आहे का, याची काटेकोर तपासणी करण्यावर भर दिला जाईल.
जिल्ह्याच्या पावन भूमीत सेवेची संधी सोलापूरच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी, सिद्धेश्वर महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा पावन भूमीत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील दोन-तीन वर्षे जनसेवेसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन.
चौकट
“असा आहे प्रशासकीय प्रवास
कुशल जैन हे २०२२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे जबलपूर (मध्य प्रदेश) येथील आहेत. यापूर्वी त्यांनी:दिल्ली येथे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात ‘सहाय्यक सचिव’ म्हणून काम केले आहे.नागपूर जिल्ह्यात एक वर्ष प्रोबेशनरी कालावधी पूर्ण केला.गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून दीड वर्ष सेवा बजावली आहे.जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर आपला विशेष कल राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.



















